Monday, December 17, 2018

शालेय भाषणे

11 लोकमान्य टिळक पुण्यतिथी

अध्यक्ष महाशय, गुरुजन आणि उपस्थित सर्व माझ्या बाल मित्र-मैत्रीणीनो. आज १ ऑगस्ट, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते.

एकदा शाळेत असताना, वर्गात मुलांनी शेंगांची टरफले टाकली. गुरुजी वर्गात आल्या नंतर त्यांनी हे पाहिले आणि टिळकांना विचारले, हि टरफले कोणी टाकली ते सांग. त्यावर टिळक म्हणाले, मी चहाडी करणार नाही. गुरुजींनी शिक्षा म्हणून त्यांना ती टरफले उचलण्यास सांगितली. त्यावर टिळक उत्तरले मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. एकदा वर्गात गुरुजींनी संत हा शब्द लिहावयास सांगितला. टिळकांनी तो शब्द तीन प्रकारे लिहिला संत, सन्त, सनत. गुरुजींनी त्यातला पहिला शब्द बरोबर देऊन बाकीचे दोन चूक दिले. त्यावर टिळकांनी गुरुजींनासर्व शब्द कसे बरोबर आहेत ते सांगितले.

टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले.पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली.

असं हे बहुमूल्य रत्न, मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना माझे शतशः प्रणाम. जय हिंद ! जय महाराष्ट्र !

No comments:

Post a Comment