Monday, December 17, 2018

बोधकथा

राम आणि भरत
➖➖➖➖➖
रावणाचा वध करून राम अयोध्‍येला परत आले आणि त्‍यांचा राज्‍याभिषेक झाला तेव्‍हा एक दिवस एका सभासदाने भरतला विचारले की आपण रामासाठी इतका मोठा त्‍याग केला आणि रामही आपल्‍याला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे की आपल्‍याला सर्वात मागे स्‍थान देण्‍यात आले आहे? भरत म्‍हणाले,'' जे झाड कडू असेल त्‍याची सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून पाप केले होते. तिचा पुत्र असल्‍यामुळे त्‍या पापाच्‍या कडवटपणातून मी कसा अलिप्त राहू शकतो? त्‍यामुळे मला मागचे स्थान देण्‍यात आले आहे.'' जेव्‍हा सभासदाने रामाला भरतचे हे विचार सांगितले तेव्‍हा रामचंद्र म्‍हणाले,''भरतचे हे विचार ठीक नाहीत, अयोध्‍येला परतल्‍यावर मी भरतला म्‍हटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यत राजा राहू शकतो जोपर्यत त्‍याचे छत्र सुरक्षित आहे.'' सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्‍याने परत जाऊन भरतला रामाचे विचार ऐकवले. भरत म्‍हणाले,''रामचंद्र तर आपल्‍या लहानातल्‍या लहान सेवकाचीही प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्‍हाला सांगितले.'' सभासद गोंधळला त्‍याने रामाला पुन्‍हा जाऊन भरतचे विचार सांगितले तेव्‍हा रामचंद्र म्‍हणाले,'' प्रेम आणि त्‍यागाच्‍या युद्धात मी भरतकडून हरलो, मी आपला पराभव स्‍वीकारून त्‍याला पाठ दाखविली, त्‍यामुळे तो पाठीमागे आहे. त्‍याचे मागे होणे हे त्‍याच्‍या महानतेचे लक्षण आहे.

तात्‍पर्य :- त्‍याग, सेवा आणि भक्ती हे तीन सूत्रे धरतीवर रामराज्‍य साकार करू शकतात. धन्‍य ते प्रभू रामचंद्र आणि त्‍यांचे बंधू

No comments:

Post a Comment